नवी दिल्ली : इंग्लंडच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची काल निवड करण्यात आली. पण भारताच्या या संघातील एका खेळाडूलाच आता करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आता भारताच्या संघात काही बदल होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णनने चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर त्याची भारतीय संघातही निवड करण्यात आली होती. पण आता त्याला करोना झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रसिधला काही दिवस उपाचर घ्यावे लागतील आणि त्याला क्वारंटाइनही व्हावे लागणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात चार नेट गोलंदाजही निवडण्यात आले आहेत. भारताच्या फलंदाजांना ते सराव करण्यात मदत करणार आहेत. यामध्ये प्रसिध कृष्णन, अभिमन्यू इश्वरन, आव्हेश खान आणि अरझान नागवासवाला यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यात पाच कसोटी सामने खेळणार आहे. पण त्यापूर्वी त्यांना अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी खेळावी लागणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ४ ते ८ ऑगस्ट या कालावधीमध्ये नॉटिंगहॅम येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना १२ ते १६ ऑगस्ट या दिवसांमध्ये लॉर्ड्सवर होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ते २९ ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये लीड्सच्या मैदानात होणार आहे. इंग्लंडच्या दौऱ्यातील भारताचा चौथा सामना २ ते ६ सप्टेंबर या दिवसांमध्ये होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि मालिकेतील अखेरचा सामना हा १० ते १४ या कालावधीत होणार आहे. भारताच्या संघात निवडण्यात आलेले लोकेश राहुल आणि वृद्धिमान साहा हे दोघेही सध्याच्या घडीला दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे ते जर फिट असतील तरच त्यांना इंग्लंडच्या दौऱ्यावर नेण्यात येणार आहे. ते जर फिट नसतील तर त्यांच्याजागी अन्य खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी सर्व खेळाडूंचा फिटनेस कसा आहे, हे पाहावे लागणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eVRRJi
No comments:
Post a Comment