मुंबई : मुंबईच्या संघाने विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत उत्तर प्रदेशला पराभूत केले आणि जेतेपदाला गवसणी घातली. उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघापुढे ३१३ धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईच्या संघाने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत उत्तर प्रदेशवर विजय सहा विकेट्स राखून साकारला. मुंबईचा सलामीवीर पृथ्वी सावने यावेळी संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. पृथ्वीने यावेळी ३९ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ७३ धावांची खेळी साकारली. पृथ्वीने सुरुवातीपासूनच उत्तर प्रदेशच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात केली. पृथ्वीच्या धडाकेबाज फटकेबाजीमुळे मुंबईच्या संघाला यावेळी ८९ धावांची सलामी मिळाली. या स्पर्धेत पृथ्वी साव हा सातत्याने दमदार फलंदाजी करत होता. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रमही पृथ्वीने आपल्या नावावर केला आहे. पृथ्वीने यावेळी मयांक अगरवालला पिछाडीवर टाकत या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पृथ्वी बाद झाल्यावर आदित्य तरेने शतक झळकावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तरेने यावेळी १८ चौकारांच्या जोरावर नाबाद ११८ धावांची खेळी साकारली. मुंबईच्या संघाने या स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ केला होता. तरेने यावेळी चौकार लगावत मुंबईच्या विजयावर झोकात शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेतील तरेची ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. मुंबईच्या संघाला सय्यद मुश्ताक अहमद ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण त्यानंतर मुंबईने या स्पर्धेते जेतेपद पटकावत अपेक्षा उंचावल्या आहेत. उत्तर प्रदेशने यावेळी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय उत्तर प्रदेशच्या सलामीवीरांनी योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण माधव कौशिक आणि सम्राट सिंग यांनी यावेळी उत्तर प्रदेशला १२२ धावांची सलामी दिली. माधव कौशिकन यावेळी मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. कौशकने यावेळी १५ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर १५८ धावांची खेळी साकारली. मुंबईकडून यावेळी तनुष कोटीयनने दोन बळी मिळवले, तर प्रशांत सोळंकीने एका फलंदाजाला बाद केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lmdC83
No comments:
Post a Comment