चेन्नई, : आर. अश्विनने आज दमदार शतक झळकावले. अश्विनच्या शतकाच्या जोरावर भारताला इंग्लंडला मोठे आव्हान देता आले. पण अश्विनने यावेळी आपल्या या शतकाचे श्रेय संघातील एका व्यक्तीला दिले आहे. आजच्या दिवसाचा खेळ संपल्यावर अश्विनने ही माहिती दिली. अश्विनचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळाला आहे. अश्विन यावेळी म्हणाला की, " गेल्या काही वर्षांपासून मी स्विपचा फटका खेळत नव्हतो. कारण त्या फटक्यामुळेच मला संघाबाहेर जावे लागले होते. पण गेल्या काही दिवसांपासून मी स्विपचा फटका खेळायला लागलो आणि त्याचा मला चांगलाच फायदा झाला. संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी माझ्या फलंदाजीवर जास्त लक्ष दिले. त्यामुळे या शतकाचे श्रेय मी विक्रम राठोड यांना देऊ इच्छितो." अश्विन पुढे म्हणाला की, " राठोड यांची फलंदाजीसाठी मला चांगली मदत झाली. गेल्या काही दिवसांपासून माझ्या फलंदाजीमध्ये जो काही बदल झाला आहे, त्यामध्ये त्यांचाही मोलाचा वाटा आहे. राठोड यांनी मला व्यक्त करण्यास मदत केली. त्याचबरोबर त्यांनी माझ्या फलंदाजीवर मेहनत घेतली. एकावेळी जास्त विचार करायचा नाही, जे समोर आता त्याचाच फक्त विचार करायचा, ही गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली. त्यामुळे गेम प्लॅननुसारच मी खेळत राहिलो आणि यश मिळत गेले. हे शतक माझ्या घरच्या मैदानावर आले, याचा आनंदही काही औरच आहे." दुसऱ्या डावात भारताकडून अश्विनने सर्वाधिक धावा केल्या आहेत. अश्विनसारखी कामगिरी आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आलेली नाही. त्याचबरोबर अश्विनने यावेळी कपिल देव, सर गॅरी सोबर्स यांच्यासह बऱ्याच महान क्रिकेटपटूंना पिछाडीवर टाकल्याचे पाहायला मिळत आहे. एकाच सामन्यात पाच विकेट्स आणि शतक झळकावण्याचा पराक्रम अश्विनने या सामन्यात केला आहे. पण अश्विनने हे पहिल्यांदाच केलेले नाही. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा त्याने अशी कामगिरी केली आहे. भारताकडून कपिल देव आणि रवींद्र जडेजा यांनी अशी कामगिरी यापूर्वी केली होती, पण कपिल आणि जडेजा यांना तिनदा अशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे एकाच सामन्यात पाच विकेट्स आणि शतक तीनवेळा झळकावणारा अश्विन हा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्यामुळेच अश्विनचे जगभरात कौतुक होत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ajNqaj
No comments:
Post a Comment