चेन्नई, : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतर कोहलीला अजून एक मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीला चांगली फलंदाजी करता आलेली नाही. गेल्या वर्षभरात कोहलीला एक शतकही झळकावता आलेले नाही. त्यामुळे कोहलीला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत चांगलाच धक्का बसला आहे. कारण कसोटीमधील फलंदाजांच्या क्रमवारीत कोहलीची आता पाचव्या स्थाडनावर घसरण झाली आहे. त्याचबरोबर द्विशतक झळकावणाऱ्या जो रुटला क्रमवारीत चांगलाच फायदा झाला आहे. पण या क्रमवारीत मात्र पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर भारताचा किंवा इंग्लंडचा एकही फलंदाज दिसत नाही. या क्रमवारीत ८५२ गुणांसह कोहलीची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे, तर दुसरीकडे रुट ८८३ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे ते न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने. या क्रमवारीत ९११ गुणांसह केन हा पहिल्या स्थानावर विराजमान आहे. या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्हन स्मिथ आहे. स्मिथच्या खात्यात ८९१ गुण आहेत. त्यामुळे कोहली या मालिकेत दमदार कामगिरी करुन अव्वल स्थान पटकावणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा २२७ धावांनी पराभव झाला. अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा खराब कामगिरी केली. भारताचा दुसरा डाव फक्त १९७ धावात संपुष्ठात आला. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. करोनानंतर भारतात झालेल्या या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. त्यामुळे भारतीय संघ दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना चेन्नई येथेच १३ फेब्रुवारीपासून होणार आहे. या सामन्यात भारतीय संघात नेमके कोणते बदल होतात आणि कोणत्या खेळाडूला संधी मिळते, याची उत्सुकता नक्कीच सर्वांना असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/372d6pX
No comments:
Post a Comment