मुंबई : जवळपास दोन दशके त्याने भारतीय क्रिकेटच सेवा केली. त्याचबरोबर सर्वात जास्त बळी मिळवण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला. पण आज निवृत्तीची घोषणा करत असताना त्या खेळाडूला रडू कोसळल्याचे पाहायला मिळाले. भारताचा माजी यष्टीरक्षक नमन ओझाने आज क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून आपली निवृत्ती जाहीर केली. रणजी करडंक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक यष्ट्यांमागे विकेट मिळवण्याचा विक्रम नमनच्या नावावर आहे. या स्पर्धेत नमनने सर्वाधिक ३५१ विकेट्स मिळवले होते. मध्य प्रदेशच्या नमनने भारताकडून एक कसोटी, एक एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामने खेळले होते. निवृत्तीची घोषणा करत असताना नमनच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले होते. यावेळी निवृत्तीची घोषणा करताना नमन म्हणाला की, " मी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून आज निवृत्ती घेत आहे. हा प्रवास फारच मोठा होता आणि चांगला होता. त्याचबरोबर या प्रवासात मला देशाचे आणि राज्याचे प्रतिनिधीत्व करायला मिळाले आणि माझे स्वप्न साकार झाले." यावेळी नमनने बीसीसीआय आणि मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे आभारही मानले आहेत. नमनने वयाच्या १७व्या वर्षी मध्य प्रदेशकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पण हा काळ माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा होता. त्यामुळे नमनला जास्त आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संधी मिळू शकली नाही. भारताकडून २०१० साली श्रीलंकेविरुद्ध तो एकदिवसीय सामना खेळला होता. त्याचबरोबर झिम्बाब्वेविरुद्ध त्याला ट्वेन्टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली होती. पण त्यानंतर त्याला एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही. पण त्यानंतर २०१५ साली नमनची निवड भारतीय कसोटी संघात झाली होती. त्यावेळी श्रीलंकेच्या दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नमनने २१ आणि दुसऱ्या डावात ३५ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर नमन हा आयपीएलमध्ये खेळताना आपल्याला दिसला होता. नमन यावेळी म्हणाला की, " सध्याच्या घडीला माझ्या पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे मला सहा महिन्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मी कोणत्याही संघात सहा सध्या खेळू शकत नव्हतो. त्यामुळे मी सध्या कुटुंबियांबरोबर वेळ व्यतित करत आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3an7JU9
No comments:
Post a Comment