चेन्नई : मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला. पण या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाकडून बऱ्याच चुका झाला आणि या चुका त्यांना चांगल्या महागात पडल्या. मुंबई इंडियन्सकडून पहिली चुक म्हणजे रोहित शर्माची विकेट. रोहित शर्मा हा चांगल्या लयीत फटकेबाजी करत होता. या आयपीएलमधील पहिला चौकार आणि पहिला षटकारही फटकावण्याचा मान रोहितला मिळाला. पण ख्रिल लीनच्या एका चुकीमुळे रोहित धावबाद झाला आणि मुंबई इंडियन्ससाठी ही पहिली चुक ठरली. रोहित बाद झाल्यावरही सूर्यकुमार यादव आणि ख्रिस लीन यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला धावांचा चांगला पाया रचून दिला. ११ व्या षटकात मुंबई इंडियन्सची १ बा ९४ अशी भक्कम स्थिती होती. त्यावेळी मुंबई इंडियन्सचा संघ दोनशे धावांच्या जवळपास पोहोचेल, असे वाटत होते. पण सूर्यकुमार आणि लीन बाद झाल्यावर मुंबईच्या फलंदाजांनी हारिकिरी पत्करल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतर इशान किशन, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या या नावाजलेल्या फलंदाजांचा चांगल्या धावा करून मुंबई इंडियन्सची धावगती वाढवता आली नाही. हीच मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठी चुक ठरली. कारण यापैकी एका फलंदाजाने जरी चांगली फटकेबाजी केली असली तरी मुंबई इंडियन्सचा संघ १६०पेक्षा जास्त धावा करू शकला असता आणि त्यांना विजय मिळवता येऊ शकला असता. या चौघांनाही यावेळी आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने बाद केले आणि मुंबई इंडियन्सचे कंबरडे मोडले. गोलंदाजी करतानाही मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. कारण रोहित शर्माने यावेळी आरसीबीचा सलामीवीर वॉशिंग्टन सुंदरचा सोपा झेल सोडला. हा झेल जर रोहितने पकडला असता तर मुंबई इंडियन्सची चांगली सुरुवात झाली असती आणि आरसीबीचा संघ पिछाडीवर ढकलला गेला असता. मुंबई इंडियन्ससाठी १८वे षटक महागडे ठरले. कारण ट्रेंट बोल्टच्या या षटकात आरसीबीच्या संघाने १५ धावा फटकावल्या आणि सामना मुंबई इंडियन्सच्या हातून निसटला. त्यानंतर जसप्रीत बुमराच्या १९व्या षटकातही आरसीबीने १२ धावा काढल्या आणि विजयाच्या दिशेने कूच केली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uAwpzS
No comments:
Post a Comment