Ads

Wednesday, December 2, 2020

IND vs AUS: भारताने अखेर लाज राखली, तिसऱ्या वनडेमध्ये मिळवला धमाकेदार विजय

कॅनबेरा, : भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपली लाज राखली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताला गेल्या सहा सामन्यांमध्ये मिळालेला हा पहिला विजय आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके झळकावली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. भारताने या सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला. भातीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या दौऱअयातील हा पहिला विजय आहे. भारताच्या ३०३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला तो पदार्पण करणाऱ्या टी. नटराजनने. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्नस लॅबुशेनला नटराजनने बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाला यावेळी सर्वात मोठा धक्का दिला तो या सामन्यात प्रथम खेळणारा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने. या संधीचे सोने शार्दुलने केले आहे. कारण भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या स्टीव्हन स्मिथला शार्दुलने फक्त सात धावांवर बाद केले आहे. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये स्मिथने शतके झळकावली होती. त्यामुळे शार्दुलने यावेळी भारताला मोठे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज झटपट बाद झाले असले तरी कर्णधार आरोन फिंच मात्र चांगली फलंदाजी करत होता. फिंचने यावेळी आपले अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करत होता. पण अष्टपैलू रवींद्र जडेजाने यावेळी फिंचला शिखर धवनकरवी झेलबाद केले आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. फिंचने या सामन्यात सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७५ धावा केल्या. फिंच बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हा खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. मॅक्सवेलने यावेळी यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीबरोबर सहाव्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी रचली. पण कोहलीने यावेळी कॅरीला ३८ धावांवर असताना धावचीत करत ही जोडी फोडली. पण त्यानंतरही मॅक्सवेल हा दमदार फलंदाजी करत होता. भारताने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३०२ धावा केल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांनी अर्धशतकी खेळी केली. भारतीय फलंदाजांना या सामन्यात काही विशेष प्रभाव टाकता आला नाही. या सामन्यात भारताची अवस्था ४ बाद १२३ अशी होती. पण एका पाठोपाठ एक विकेट पडत असताना एका बाजूने विराटने संयमी फलंदाजी सुरू ठेवली होती. या सामन्यात त्याने २३वी धाव पूर्ण करत वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १२ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने सचिन तेंडुलकरचा ३०० डावात १२ हजार धावांचा विक्रम मोडला. विराट मोठी खेळी करेल असे वाटत असताना जोश हेजलवुडने त्याला ६३ धावांवर बाद केले. या मालिकेत हेजलवुडने त्याला तिसऱ्यांदा बाद केले. विराट बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांनी संघाला ३०२ धावांपर्यंत मजल मारून दिली. हार्दिकने मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या पाठोपाठ जडेजाने देखील अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. त्यांनी नाबाद १५० धावांची भागिदारी केली. भारताकडून सहाव्या विकेटसाठी झालेली ही तिसऱ्या क्रमांकाची भागिदारी ठरली. हार्दिकने ७६ चेंडूत १ षटकार आणि ७ चौकारांसह नाबाद ९६ तर रविंद्र जडेजाने ५० चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ६६ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37tLPvQ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...