कॅनबेरा, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज सुरु आहे. भारताने ही मालिका यापूर्वीच गमावलेली आहे. पण या तिसऱ्या सामन्यात जर भारताने विजय मिळवला तर त्यांना इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे, असे पाहायला मिळत आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये भारतीय संघ कॅनबेराच्या मानुका ओव्हल मैदानावर आपला तिसरा सामना खेळत आहे. पण आतापर्यंत भारताला या मैदानात एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे भारताने हा सामना जर जिंकला तर त्यांचा हा १२ वर्षांतील पहिला विजय असेल. भारताने या मैदानात कोणाबरोबर कसे सामने गमावले आहेत, पाहा... या मैदानात भारताचा पहिला सामना २००८ साली श्रीलंकेबरोबर झाला होता. पावसामुळे हा सामना २९ षटकांचा खेळवण्याचे ठरले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना २९ षटकांमध्ये १९५ धावा केल्या होत्या. भारताकडून रोहित शर्माने या सामन्यात सर्वाधिक नाबाद ७० धावांची खेळी साकारली होती. रोहितच्या या खेळीमुळेच भारताला श्रीलंकेला १९६ धावांचे आव्हान देता आले होते. पण भारताच्या डावानंतर पुन्हा एकदा पाऊस पडला आणि षटके कमी करण्यात आली. अखेर श्रीलंकेने डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारतावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये २०१६ साली या मैदानात पहिला सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३४८ धावांचा डोंगर उभारला होता. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी आरोन फिंचने १०७ धावांची खेळी साकारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन या दोघांनीही शतके झळकावली होती. पण भारताला आव्हानाचा पाठलाग करताना ३२३ धावाच करता आल्या आणि त्यांना २५ धावांनी कपराभव पत्करावा लागला होता. आतापर्यंत भारताच्या झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळ आजच्या सामन्यात जर भारतीय संघ जिंकला तर त्यांचा हा पहिला विजय असेल. त्यामुळे आजच्या सामन्यात इतिहास रचण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fX0dRb
No comments:
Post a Comment