कॅनबेरा : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. कारण या सामन्यात नाबाद ४४ धावांची धडाकेबाज खेळी साकारणाऱ्या रवींद्र जडेजाला दुखापत झाल्याचे समजते आहे. क्रिकइन्फो या संकेतस्थळाने याबाबतची माहिती दिली आहे. जडेजा या सामन्यात गोलंदाजी करणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कारण जडेजाच्या जागी आता युजवेंद्र चहल गोलंदाजी करू शकतो, असे म्हटले जात आहे. भारताचा डाव या सामन्यात अडचणीत सापडला होता. कारण भारतीय संघाची या सामन्यात ५ बाद ९२ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी जडेजाने धडाकेबाज फलंदाजी केली. जडेजाने यावेळी २३ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ४४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. पण ही खेळी झाल्यावर जडेजाला दुखापत झाली असल्याची माहिती क्रिकइन्फो या संकेतस्थळाने दिली आहे. त्यामुळे जर जडेजाला दुखापत झाली असेल आणि ती गंभीर स्वरुपाची असेल तर त्याला या सामन्यात गोलंदाजी करता येणार नाही. याबाबतची कोणतीही माहिती बीसीसीआय किंवा भारतीय संघाने दिलेली नाही. जडेजाची दुखापत किती गंभीर आहे, हे पाहायला लागेल. जर जडेजाची दुखापत गंभीर नसेल तर तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात पुन्हा खेळू शकतो. पण जर त्याची दुखापत जर गंभीर असेल तर त्याला ऑस्ट्रेलियामध्ये एकही सामना खेळता येणार नाही. रोहित शर्माचेही पायांचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाऊ शकला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने ७ बाद १६१ धावा केल्या. भारताकडून केएल राहुलकडून अर्धशतक केले. राहुल वगळता अन्य कोणाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. भारताने सातत्याने विकेट गमवल्या त्यामुळे मोठी धावसंख्या करता आली नाही. रविंद्र जडेजाने अखेरच्या काही षटकात फटकेबाजी केल्यामुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या करता आली. भारताच्या डावाची सुरूवात केएल राहुल आणि शिखर धवन यांनी केली. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शिखर पुन्हा एकदा अपयशी ठरला. शिखर सहा चेंडूत फक्त १ धाव करू शकला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. तो ९ धावाकरून माघारी परतला. दरम्यान केएल राहुलने ३७ चेंडू ५० धावा केल्या. पण धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात राहुल ५१ धावांवर बाद झाला. राहुल बाद झाल्यानंतर हार्दिक आणि जडेजा तिसऱ्या वनेड सामन्याप्रमाणे मोठी धावसंख्या उभी करून देतील असे वाटले होते. पण फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात हार्दिकने विकेट गमावली. अखेरच्या षटकात वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. जडेजाने फक्त २३ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ४४ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3onmlqN
No comments:
Post a Comment