अमित कुमार/ नवी दिल्ली: खराब कामगिरीमुळं भारताच्या मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज आणि विकेटकीपर टीकेचा धनी ठरत आहे. त्याचवेळी बीसीसीआयचे अध्यक्ष हे त्याच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. रिषभ पंतकडे स्पेशल टॅलेंट आहे. असे कौतुकोद्गार गांगुली यांनी काढले. भारताचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंग धोनी हा सध्या क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या काही मालिकांसाठी भारतीय संघात धोनीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याचवेळी रिषभ पंतला अधिकाधिक संधी दिली जात आहे. धोनीनंतर रिषभ पंत हा त्याची जागा घेऊ शकतो, असा विश्वास संघ व्यवस्थापनाला आहे. त्यादृष्टीनं त्याच्याकडे पाहिलं जात आहे. मात्र, त्याच्या खराब कामगिरीमुळं तो टीकेचा धनी ठरत आहे. त्याच्या कामगिरीत सातत्य दिसून येत नाही. फलंदाजीमध्ये तो अपयशी ठरत आहे. तर यष्टीच्या मागेही तो फारशी चमक दाखवू शकलेला नाही. दुसरीकडे रिषभ पंतच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळावी, या मागणीनं जोर धरला आहे. वनडे आणि टी-२० संघात सॅमसनला संधी दिली जावी असा एक मतप्रवाह आहे. खराब कामगिरीमुळं अनेक दिग्गज क्रिकेटपटू आणि चाहत्यांच्या निशाण्यावर असलेल्या रिषभ पंतच्या पाठिशी सौरव गांगुली खंबीरपणे उभे राहिले आहेत. पंतकडे स्पेशल टॅलेंट आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. रिषभ पंतचा निर्णय निवड समिती सदस्यांचा आहे. पण माझ्या मते पंतकडे विशेष प्रतिभा आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये तो कशा प्रकारे खेळला हे आपण सर्वांनी पाहिलं आहे, असं गांगुली म्हणाले. त्याची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी चांगली आहे, पण अंतिम निर्णय हा निवड समिती सदस्यांचा असेल, असंही ते म्हणाले. गुलाबी चेंडूनं पहिलावहिला कसोटी सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात झाला. भारतानं हा कसोटी सामना जिंकला होता. या सामन्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आगामी काळात गुलाबी चेंडूवर कसोटी सामने आयोजित करण्यात येतील का? याबाबत गांगुली यांना विचारण्यात आलं. त्यावेळी आम्ही यावर इतर देशांच्या क्रिकेट बोर्डांशी चर्चा करत आहोत. मात्र, गुलाबी चेंडूवरील कसोटी भारतात लोकप्रिय ठरली आहे, असं ते म्हणाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35x7d0h
No comments:
Post a Comment