किंग्जटन: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं वेस्ट इंडीजला दुसऱ्या कसोटीत २५७ धावांनी पराभूत करून मालिकेवर कब्जा केला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा २८ वा कसोटी विजय असून, तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार झाला. त्यानं २०११ साली वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. कसोटी कारकिर्दीतील पहिलं द्विशतकही त्यानं कॅरेबियन भूमीवर झळकावलं होतं. आता सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार होण्याचा मानही त्यानं याच भूमीवर मिळवला आहे. दुसऱ्या कसोटीत भारतानं वेस्ट इंडीजसमोर ४६८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात विंडीज संघाचा डाव २१० धावांवर आटोपला. भारतानं पहिल्या डावात ४१६ धावा केल्यानंतर विंडीजला ११७ धावांतच गुंडाळले. २९९ धावांची आघाडी घेतल्यानंतरही कोहलीनं फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. दुसऱ्या डावात भारतानं ४ बाद १६८ धावा करून डाव घोषित केला. कोहलीनं या विजयाचं श्रेय संपूर्ण संघाला दिलं आहे. या विजयासह कोहलीनं अनेक विक्रम केले. त्यानं ४८ कसोटी सामन्यांत नेतृत्व करताना २८ विजय मिळवले. तर धोनीनं ६० कसोटी सामन्यांत नेतृत्व करताना २७ सामने जिंकले होते. सौरव गांगुलीनं ४९ सामन्यांतील २१ सामन्यांत विजय मिळवला होता. अजहरुद्दीननं १४ कसोटी सामने जिंकले होते. कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ आतापर्यंत १० कसोटी सामन्यांत पराभूत झाला आहे. तर धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला १८ सामन्यांत पराभूत व्हावं लागलं होतं. भारताच्या बाहेर कोहलीच्या नेतृत्वाखाली संघानं १३ वा विजय मिळवला आहे. सध्या तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. वनडेमध्ये धोनी अव्वल वनडेमध्ये महेंद्रसिंग धोनी सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने २०० पैकी ११० सामने जिंकले आहेत. अजहरुद्दीननं ९० आणि गांगुलीनं ७६ सामने जिंकले आहेत. विराटनं ८० पैकी ५८ वनडे सामने जिंकले आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34hjx5n
No comments:
Post a Comment