इंदूर: सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. आज भारताने बांगलादेशचा एक डाव आणि १३० धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच विराट प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळा डावाने मात देणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दहावेळा प्रतिस्पर्धी संघाचा डावाने धुव्वा उडवला आहे. या जबरदस्त कामिगीरीसोबतच विराटने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. धोनीने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना नऊ वेळा भारतीय संघाला डावाने विजय मिळवून दिला होता. धोनीनंतर या यादीत मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरभ गांगुलीचा नंबर लागतो. अझर आणि गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने क्रमश: आठ आणि सातवेळा डावाने विजय मिळवले आहेत.
यंदाचा मोसम भारतीय संघासाठी सर्वाधिक यशस्वी ठरला. भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला भारताने पुणे कसोटीत एक डाव आणि १३७ धावांनी पराभूत केले होते तर त्यानंतर रांचीमध्येही त्याची पुनरावृत्ती करत भारताने एक डाव आणि २०२ धावांनी पाहुण्या संघाला मात दिली होती. दरम्यान, भारतीय संघाने आज इंदूर कसोटीत तिसऱ्याच दिवशी पाहुण्या बांगलादेश संघाला पराभवाची धूळ चारली. भारताने बांगलादेशवर एक डाव आणि १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशने या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली मात्र भारताच्या गोलंदाजांनी पाहुण्या संघाच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. पहिल्या डावात बांगलादेशला भारताने १५० धावांत गुंडाळले. त्यानंतर भारताने सलामीवीर मयांक अग्रवालच्या खणखणीत द्विशतकाच्या जोरावर ६ गडी बाद ४९३ धावा उभारून डाव घोषित केला. बांगलादेशला डावाने पराभव टाळण्यासाठी ३४३ धावांची गरज होती. मात्र बांगलादेशचा संपूर्ण संघ २१३ धावांत गारद झाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2r1OVWA
No comments:
Post a Comment