वृत्तसंस्था, राजकोट दिल्लीच्या प्रदूषणाचा आणि भारताच्या नवख्या गोलंदाजीचा सहज सामना करून बांगलादेशने मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभूत केले. याविजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने १-० अशी आघाडी घेतली. गुरुवारी होणारी दुसरी लढत जिंकून ऐतिहासिक मालिका विजयासाठी संघ सज्ज झाला आहे. दुसरीकडे, पहिल्या लढतीतील चुका टाळून बांगलादेशविरुद्ध बरोबरी साधण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघही उत्सुक आहे. या लढतीवर ‘महा’ चक्रीवादळाचे सावट असून, पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तेव्हा राजकोटच्या मैदानावर कोणाचे वादळ घोंघावते आणि त्यात कुणाचा पाचोळा होतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. शाकीब अल हसन, तमिम इक्बाल या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत मिळविलेल्या या विजयाने बांगलादेशचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्यामुळे दुसऱ्या लढतीत भारतीय संघाला दडपण न घेता खेळावे लागणार आहे. मागील लढतीत ‘डीआरएस’चा निर्णय चुकणे, फलंदाजांचे अपयश आणि क्षेत्ररक्षणातील चुकांचा मोठा फटका भारताला बसला आहे. लोकेश राहुलच्या जागी संजू सॅमसन किंवा मनीष पांडेला दुसऱ्या टी-२०मध्ये संधी मिळू शकते. सर्वाधिक टीका झाली ती युवा यष्टीरक्षक, फलंदाज पंतवर. त्याला २६ चेंडूंत केवळ २७ धावा करता आल्या. त्यातच ‘डीआरएस’चे निर्णय घेताना त्याची हुशारी दिसली नाही. सामन्यागणिक तो निराशा करत आहे. बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाने पहिल्या टी-२०मध्ये भारताच्या फलंदाजांना रोखण्यासाठी आठ गोलंदाजांचा वापर केला होता. त्याची ही योजना यशस्वी ठरली होती. लिटन दास, मोहम्मद नैम, सौम्य सरकार, मुशफिकर रहीम, महमुदुल्ला असे चांगले फलंदाज या संघाकडे आहेत. मागील लढतीत रहीमने ४३ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारसह नाबाद ६० धावा करून बांगलादेशला विजय मिळवून दिला होता. त्याच्याकडून संघाला अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. स्थळ : सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, राजकोट वेळ : सायंकाळी ७ पासून
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NTY3V0
No comments:
Post a Comment