इंदूर: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतानं १ डाव १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत बांगलादेशचा दुसरा डाव २१३ धावांवर संपुष्टात आणला. या विजयासह भारतानं कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. इंदूर येथील होळकर मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना रंगला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाहुण्या बांगलादेश संघानं भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या तोफखान्यासमोर पहिल्याच दिवशी शस्त्रे खाली ठेवली. अवघ्या १५० धावांतच बांगलादेशचा संघ गारद झाला. मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव या वेगवान गोलंदाजांच्या तिकडीने मिळून बांगलादेशचे सात फलंदाज टिपले. त्यांना साथ मिळाली ती आर. अश्विनची. त्याने २ बळी मिळविले. पहिल्या डावात मुशफिकुर रहीमनं सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघानं पहिला डाव ६ बाद ४९३ धावांवर घोषित केला. सलामीवीर मयांक अग्रवालनं २४३ धावांची खेळी केली. रोहित शर्मा अवघ्या सहा धावा करून बाद झाला. चेतेश्वर पुजारानं ५४ धावा करून चांगली साथ दिली. कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला. अजिंक्य रहाणेनं ८६ धावा केल्या. तर अष्टपैलू रवींद्र जडेजानं ६० धावांची तुफानी खेळी केली. उमेश यादवनंही २५ धावा केल्या. बांगलादेशकडून अबु झायेदनं ४ विकेट घेतल्या.
भारतानं ४९३ धावांवर डाव घोषित केल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही अडखळत झाली. ७२ धावांवरच बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत परतला होता. इम्रउल कायेस, शदमन इस्लाम, मोमिनुल हक, मोहम्मद मिथुन, महमुदुल्लाह हे बाद झाले होते. मुशफिकुर रहीमनं दुसऱ्या डावातही ६४ धावा करून कसोटी वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला आर. अश्विननं बाद केलं. भारताच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशची अंतिम फळी मैदानावर फार काळ तग धरू शकली नाही. त्यांचा डाव २१३ धावांवर आटोपला. भारतानं १ डाव आणि १३० धावांनी बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर अश्विननं दोन आणि उमेश यादवनं दोन विकेट घेतल्या. या विजयासह भारतानं बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32O4TRj
No comments:
Post a Comment