नवी दिल्ली: २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखील भारतीय संघानं वर्ल्डकप जिंकला होता. अंतिम सामन्यात सलामीवीर गौतम गंभीरनं ९७ धावांची खेळी केली होती. मात्र, त्याचं शतक पूर्ण होऊ शकलं नव्हतं. धोनीमुळं माझं शतक पूर्ण होऊ शकलं नव्हतं, असा खळबळजनक आरोप गंभीरनं केला आहे. धोनीच्या एका सल्ल्यामुळं माझी एकाग्रता भंग झाली होती, असंही तो म्हणाला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं २८ वर्षांनंतर वर्ल्डकपचं जेतेपद दुसऱ्यांदा जिंकलं होतं. याआधी त्याच्या नेतृत्वाखालीच २००७मध्ये टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपदही जिंकलं होतं. त्यामुळं धोनी हा सर्वात यशस्वी कर्णधार असल्याचं सिद्ध झालं होतं. मात्र, दोन्ही वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सलामीवीर गौतम गंभीरनं तुफानी खेळी करून विजयात मोलाचा वाटा उचलला होता. २००७ साली टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये गंभीरनं ७५ धावा कुटल्या होत्या. मात्र, त्यावेळी तीन विकेट घेणारा इरफान पठाण हा सामनावीर ठरला होता. तर २०११साली झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये गंभीरनं ९७ धावांची तुफानी खेळी केली होती. त्यावेळी ९१ धावा करणारा धोनी सामनावीर ठरला होता. याआधीही गंभीरनं धोनीच्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. २०१२मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून सचिन, सेहवाग आणि त्याला वगळण्यात आलं होतं. त्यावरही गंभीरनं नाराजी व्यक्त केली होती. आता त्यानं २०११ साली झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमधील खेळीवरून धोनीला लक्ष्य केलं आहे. फायनलमध्ये ९७ धावांवर असताना धोनीनं मला सल्ला दिला आणि मी शतकी खेळी करण्यात अपयशी ठरलो. ९७ धावांवर खेळत असताना मी वैयक्तिक धावांचा विचारही केला नव्हता. त्यावेळी श्रीलंकेनं दिलेल्या लक्ष्याकडे माझं लक्ष होतं. मला आठवतं की, धोनी माझ्यासोबत मैदानात खेळत होता. तुझं शतक पूर्ण होण्यासाठी फक्त तीन धावा आहेत. तू तीन धावा काढून शतक पूर्ण कर, असं धोनीनं मला त्यावेळी सांगितलं. पण त्यानं मला हा सल्ला दिला नसता तर मी तीन धावा काढल्या असत्या. त्यानं मला आठवण करून दिली आणि मी अधिक सावध झालो. थिसारा परेराच्या पुढच्या चेंडूवर एक चुकीचा फटका मारून मी बाद झालो, असं गंभीरनं सांगितलं. ९७ धावांवर खेळत होतो त्यावेळी मी वर्तमानात होतो. पण शतकासाठी तीन धावा काढायच्या आहेत असा विचार माझ्या मनात आला आणि माझं लक्ष विचलित झालं. त्यामुळं मी विकेट गमावून बसलो. त्यामुळं तुम्ही वर्तमानात राहणं गरजेचं आहे. बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये गेलो आणि मी स्वतःलाच सांगितलं की या तीन धावा मला आयुष्यात त्रासदायी ठरतील आणि ते खरं ठरत आहे. तू तीन धावा का काढल्या नाहीत, असा प्रश्न आजही काही लोक मला विचारतात, असं गंभीर म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/354aWCK
No comments:
Post a Comment