किंग्जटन: भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीजला २५७ धावांनी नमवलं. कर्णधार विराट कोहलीनं या विजयाचं श्रेय संघ सहकाऱ्यांना दिलं आहे. काही सत्रांत भारतीय संघ दबावात होता. मात्र, सर्वोत्तम खेळ करून सहज विजय मिळवण्यात संघ यशस्वी झाला, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली. भारतानं ठेवलेल्या ४६८ धावांचं लक्ष्य पार करताना दमछाक झालेल्या वेस्ट इंडीजचा डाव २१० धावांवर आटोपला. भारताकडून रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी तीन, तर इशांत शर्मानं दोन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहनं एक विकेट घेतली. विराटनं विजयाचं श्रेय संघाला दिलं आहे. कर्णधाराच्या रुपानं तुमच्या नावासमोर फक्त 'सी' हे अक्षर जोडलं जातं. पण उर्वरित संघ सहकारी सामूहिक कामगिरी करतात, असं विराट म्हणाला. 'आम्ही चांगला खेळ केला आणि तसा निकालही आमच्या बाजूने लागला. तो संघासाठी निश्चितच महत्वाचा आहे. काही सत्रांत आमच्यावर दबाव होता. फलंदाजी करताना कठीण परिस्थितीतही खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली, असं विराटनं सांगितलं. यावेळी विराटनं हनुमा विहारीसह अजिंक्य रहाणे, मयांक आणि गोलंदाज इशांत शर्मा, शमीसह बुमराहचंही विशेष कौतुक केलं. हनुमा यानं चांगली फलंदाजी केली. अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावात उत्कृष्ट खेळला. मयांकनंही पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. इशांतची अर्धशतकी खेळी जबरदस्त होती. हनुमाची खेळी तर विश्वस्तरीय होती. त्याच्यात कमालीचा आत्मविश्वास दिसत होता. तो फलंदाजी करत असताना ड्रेसिंग रुममध्येही उत्साह असतो. तो नेहमीच खेळात आणि चुकांमध्ये सुधारणा करत असतो, अशी कौतुकाची थाप विराटनं दिली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HCLV8k
No comments:
Post a Comment