Ads

Wednesday, October 16, 2019

द्विशतकवीर यशस्वी कधीकाळी पाणीपुरी विकायचा

मुंबई: क्रिकेटपटू होण्यासाठी मैदानाबाहेर कधी पाणीपुरी विकायचा तर कधी इतर संघांनी टोलावलेल्या चेंडू हरवला की शोधायचा. होय ही आहे यशस्वी जयस्वालची संघर्ष कहाणी...मुंबईच्या याच युवा फलंदाजानं इतिहास रचलाय. त्यानं बुधवारी बेंगळुरूत विजय हजारे करंडक स्पर्धेतील सामन्यात झारखंडविरुद्ध १५४ चेंडूंत २०३ धावांची तुफानी खेळी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणारा तो सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. यशस्वी जयस्वालनं या द्विशतकी खेळीत १२ षटकार तडकावले आहेत. या स्पर्धेतील हा एक विक्रम आहे. याच वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये युवा फलंदाजानं पदार्पण केलं. तो मूळचा उत्तर प्रदेशातील भदोईचा रहिवासी आहे. क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तो अकराव्या वर्षी मुंबईत आला होता. त्यानंतर तो एका डेअरीत काम करू लागला. डेअरीच्या मालकानं एके दिवशी त्याला कामावरून काढून टाकलं होतं. एका क्लबनं त्याला मदत केली. पण चांगला खेळलास तरच तुला येथे राहता येईल, अशी अट त्याच्यासमोर ठेवली. उत्तर प्रदेशातील भदोईत राहणाऱ्या एका लहान दुकानदाराचा मुलगा असलेल्या यशस्वीनं खूपच कमी वयात मोठं स्वप्न पाहिलं होतं. त्याला क्रिकेटपटू व्हायचं होतं. मुंबईतील एका नातेवाईकाकडे राहण्यासाठी जाण्याचा हट्ट त्यानं वडिलांकडे धरला. वडिलांनीही त्याला थांबवलं नाही. कारण आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. मुंबईच्या वरळीत संतोष नावाचा नातेवाइक राहत होता. पण त्याचं घरही लहान होतं. मुंबईच्या काळबादेवीतील डेअरीत केवळ झोपण्याची जागा त्याला मिळाली. पण त्यासाठी त्याला डेअरीत राबावं लागत असे. यशस्वी दिवसभर क्रिकेट खेळत असतो हे पाहिल्यावर डेअरी मालकानं त्याला निघून जाण्यास सांगितलं. मुंबईतील क्रिकेटची नर्सरी समजल्या जाणाऱ्या आझाद मैदानात यशस्वी पोहोचला. तेथे मुस्लीम युनायटेड क्लबमध्ये ग्राऊंड्समनसह राहण्याची त्याला परवानगी देण्यात आली. चांगला खेळलास तरच तुला येथे राहता येईल, अशी त्याच्यासमोर अट ठेवली होती. या क्लबमध्ये संतोष मॅनेजर म्हणून काम करत होता. जवळपास तीन वर्षे यशस्वी तेथे राहिला. मुंबईत जे कष्ट झेलावे लागतात त्याबद्दल त्यानं घरच्यांना सांगितलं नाही. आपलं क्रिकेटर होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी तो मेहनत घेत राहिला. त्याचं फळ त्याला आज मिळालं. आंतरराष्ट्रीय संघात खेळण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या यशस्वीची वाटचाल त्या दिशेनं सुरू झाली आहे. पाणीपुरी विकून पैसे कमवायचा... यशस्वीचे वडील त्याच्यासाठी काही पैसे पाठवायचे. पण ते कमी पडायचे. यावरही त्यानं यशस्वी मात केली. आझाद मैदानात होणाऱ्या रामलीलादरम्यान तो पाणीपुरी विकायचा. आपले सहकारी पाणीपुरी विकताना तर पाहणार नाहीत ना, याची त्याला भीती असायची. क्लबच्या टेंटमध्ये चपात्या बनवण्याचं काम तो करत होता. त्यामुळं दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची त्याची सोय व्हायची. पैसे कमावण्यासाठी त्यानं हरवलेले चेंडू शोधण्याचंही काम केलंय. आझाद मैदानात होणाऱ्या सामन्यांदरम्यान अनेकदा चेंडू हरवायचे. ते शोधून आणण्याचे काम तो करायचा. त्याचे त्याला पैसेही मिळायचे. प्रशिक्षकांमुळे मी घडलो... आझाद मैदानात एक दिवस यशस्वी फलंदाजी करत होता. त्यावेळी प्रशिक्षक ज्वाला सिंह यांची नजर त्याच्यावर पडली. ज्वाला हे देखील उत्तर प्रदेशातील आहेत. जेव्हा ए डिव्हीजनच्या संघांमधील गोलंदाजाविरुद्ध त्याला खेळताना पाहिलं त्यावेळी त्याच्या शैलीनं मी प्रभावित झालो. माझी आणि यशस्वीची कहाणी एकसारखीच आहे. मुंबईमध्ये मी आलो तेव्हा राहायला घर नव्हतं. कुणी मार्गदर्शकही नव्हता, असं ज्वाला सांगतात. ज्वाला यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीची फलंदाजी कमालीची सुधारली. गेल्या वर्षी त्यानं पन्नासहून अधिक शतके झळकावली आहेत. यशस्वी ज्वाला यांचं कौतुक करताना थकत नाही. मी तर त्यांचा मानस पुत्र आहे. मी आज जे काही आहे ते प्रशिक्षक ज्वाला यांच्यामुळेच...असं यशस्वीनं सांगितलं.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VMIKki

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...