लंडन : फक्त एकच चुक इंग्लंडला दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगलीच महागात पडली. या चुकी मोठा फटका इंग्लंडच्या संघाला बसला आणि त्यामुळेच त्यांना हा सामना गमवावा लागला. पाचव्या दिवशी इंग्लंडच्या संघाने रिषभ पंतला लवकर बाद केले. त्यामुळे हा सामना आता इंग्लंड जिंकणार, असे वाटत होते. पण त्यानंतर इंग्लंडकडून एक मोठी चुक घडली. इंग्लंडचा संघ यावेळी बदला घेण्यासाठी गेला आणि तिथेच फसला. जसप्रीत बुमराने यापूर्वी इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला गोलंदाजी करताना बाऊन्सर्स टाकले होते. त्यामुळे पाचव्या दिवशी जेव्हा बुमरा फलंदाजीला आला तेव्हा इंग्लंडचा कर्णधार जो रुटने मार्क वुडला बाऊन्सर्स टाकण्यासाठी सांगितले आणि त्यामध्येच त्यांचे लक्ष लागून राहीले होते. बुमरा आता जास्त काळ फलंदाजी करू शकणार नाही, हे त्यांनी आपल्या मनाशी निश्चित केले होते. पण हा प्लॅन त्यांच्याच अंगाशी आल्याचे पाहायला मिळाले. कारण जेव्हा बुमरावर बाऊन्सर्सचा मारा करण्यात आला त्यानंतर तो चांगलाच पेटून उठल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भारतीय संघात इर्षा निर्माण झाली. त्यामुळेच आतापर्यंत जास्त धावा न करू शकणारे मोहम्मद शमी आणि बुमरा हे दोघेही खेळपट्टीवर भक्कमपणे पाय रोवून उभे राहिले. यावेळी शमी आणि बुमरा फक्त खेळपट्टीवर उभे राहीले नाहीत तर त्यांनी जलदगतीने धावाही जमवल्या. शमीने तर यावेळी अर्धशतकही झळकावले. शमी आणि बुमरा यांनी नवव्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी रचली आणि त्यामुळे हा सामना इंग्लंडला आपल्या हातून गमवावा लागला. कारण इंग्लंडच्या संघाला यावेळी शमी आणि बुमरा हे अशी फलंदाजी करतील, असे वाटलेही नव्हते. त्यानंतर इंग्लंडच्या संघाचा अहंकार ठेचला गेला आणि त्यांना हा सामना गमवावा लागला. आपण भारताचा दुसरा डाव झटपट आटपू, असे इंग्लंडला वाटत होते. पण यावेळी त्यांचा अहंकार त्यांच्या अंगाशी आला. भारतीय फलंदाजांना लवकर बाद करण्यापेक्षा त्यांना कसं घाबरवता येईल, हे त्यांनी पाहिलं आणि तिथेच सामन्याची सर्व समीकरणं बदलली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2W405tm
No comments:
Post a Comment